वेब टीम : अहमदनगर जिल्हा केरोसिनमुक्त झालेला असल्याने जिल्हयातील पूर्वी रॉकेल घेणारे कार्डधारकांची सोय होण्याचे दृष्टीने राज्य श...
वेब टीम : अहमदनगर
जिल्हा केरोसिनमुक्त झालेला असल्याने जिल्हयातील पूर्वी रॉकेल घेणारे कार्डधारकांची सोय होण्याचे दृष्टीने राज्य शासनामार्फत उज्वला गॅस योजने अंतर्गत ज्या कुंटूंबामध्ये गॅस नाही. अशा कुटूंबाला गॅस देण्यासाठी दि. 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. अशा कुटूंबानी ते रहात असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून अर्ज प्राप्त करुन घेवून या कालावधीत अर्ज, हमीपत्र, कूटूंबातील सर्व सदस्याचे आधारकार्ड , बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्र संबंधीत स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे देवून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आहे.
उज्ज्वला गॅस योजनेची जिल्ह्यात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी सुरु आहे. त्याचबरोबर केरोसीनची मागणी आता नसल्याने जिल्हा केरोसीनमुक्त झाला आहे. मात्र, अद्यापही काही कुटुंबांकडे गॅस जोडणी नसेल तर त्यांनी लगतच्या त्यांची नोंद असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून गॅस जोडणीसाठीचा अर्ज घेऊन तो भरुन द्यावयाचा आहे. सोबत आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत, जेणेकरुन तात्काळ या योजनेचा लाभ देता येईल, असे आवाहन श्रीमती माळी यांनी केले आहे.
याशिवाय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना लाभार्थी व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यासाठी धान्य वितरित केले जाते. योजनेंतर्गत जिल्ह्यात लाभार्थ्याची निवड करण्यासाठी निकष खालीलप्रमाणे -
अंत्योदय अन्न योजना - दारिद्रय रेषेखालील कुटूंब, ज्या कुटूंबाचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी या अपंग किंवा 60 वर्षे वयावरील वृध्द आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही, एकटे राहात असलेले दुर्धर आजारग्रस्त / अपंग /विधवा/ 60 वर्षावरील वृध्द ज्यांना कुठलाही कौटुबिक या सामाजिक आधार अथवा कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही, आदिम आदिवासी कुटूंबे ( माडीया, कोलाम, कातकरी) , भूमिहीन शेतमजूर,अल्पभुधारक शेतकरी , ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्ट क्षेत्रात रोजदारीवर काम करुन उपजिविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकल, रिक्षा चालविणारे, हातगाडीवरुन मालाची ने-आण करणरे, फळे आणि फुले विक्रेते, गारुडी , कच-यातील वस्तू गोळा करणारे तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तीची कुटूंबे, कुष्ठरोगी/ बरा झालेला कुष्ठरोगी कुटूंब प्रमुख असलेली कुटूंबे, मोटारवाहन नसलेली कुटुंबे (दुचाकी व चार चाकी), कुटूंबाकडे निवासी दुरध्वनी नसावा, कच्च्या घरांमध्ये राहणारी कुटुंबे यांचा समावेश होतो.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना – ग्रामीण भागाकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 44 हजार व शहरी भागाकरीता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 59 हजार, मोटार वाहन नसलेली कुटूंबे, भुमिहीन कुटूंबे / किमान जमीन धारक कुटूंबाचा समावेश होतो.
जिल्ह्यासाठी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यासाठी माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 करिता वितरीत करण्यात येणारे अन्नधान्याचे सुधारीत मासिक नियतन देण्यात आलेले आहे. अत्योदय अन्न योजनेतील प्रति कार्डास 26 किलो गहू व 9 किलो तांदुळ ( 2/- प्रतिकिलो दाराने गहू व 3/- प्रतिकिलो दराने तांदूळ) प्राधान्य कूंटुबातील लाभार्थ्यासाठी प्रति लाभार्थी 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ ( 2/- प्रतिकिलो दाराने गहू व 3/- प्रतिकिलो दराने तांदूळ) देण्यात येणार आहे. याप्रमाणे निकष पूर्ण करणा-या शिधापत्रिका धारकांनी सवलतीच्या दराने लाभ घेण्यासाठी संबंधित तहसीलदार/ अन्न धान्य वितरण अधिकारी यांचेकडेस हमीपत्र सादर करुन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शिधापत्रिकेत नमुद सर्व सदस्य यांची पडताळणीचे काम चालू असून त्याकामी लाभार्थी यांनी शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे समक्ष आधार कार्ड, संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांना उपलब्ध करुन देवून आधार पडताळणी करुन घ्यावी. लाभार्थी यांनी योजनेनिहाय मिळणारे धान्याची संबंधीत स्वस्त धान्य दुकानदार यांचेकउून पावती घ्यावी. सदरच्या पावतीनुसार मिळालेले धान्याची खातरजमा करण्याची जबाबदारी लाभार्थ्याची असल्याचे कळविण्यात आले आहे.
याशिवाय, शिधापत्रिका धारकाकडील दुचाकी/चारचाकी व जमिनीची मालकी इत्यादी बाबत प्रादेशिक परिवहन विभाग व महसूल विभागांशी समन्वय ठेवून अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम राबविण्यात येत आहे.
COMMENTS