वेब टीम : दिल्ली मोदी सरकारने जम्मू काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय घेत राज्याला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा ...
वेब टीम : दिल्ली
मोदी सरकारने जम्मू काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय घेत राज्याला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ही घोषणा केली. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. पाकिस्तानमधील शेअर बाजारात याचा परिणाम दिसला असून खूप मोठी घसरण झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. दरम्यान पाकिस्तानने भारताला पोकळ धमकी दिली असून भारताने अत्यंत धोकादायक खेळी केली असून, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं म्हटलं आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरैशी यांनी म्हटलं आहे की, “भारताने अत्यंत धोकादायक खेळी केली आहे. संपूर्ण क्षेत्रावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. इम्रान खान काश्मीर समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना भारत सरकारच्या या निर्णयाने समस्येचा गुंता वाढवला आहे. आता काश्मिरींवर पहिल्यांपेक्षा अधिक कडक पहारा लावण्यात आला आहे. आम्ही यासंबंधी संयुक्त राष्ट्राला सांगितलं आहे. इस्लामिक देशांनाही आम्ही याची माहिती दिली आहे”.
370 हद्दपार होणार; आता काय होणार?
देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वितीय सरकारने घेतला आहे. देशातील अत्यंत संवेदनशील राज्य असलेल्या जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० काढून टाकण्याची शिफारस केली आहे. या निर्णयाने जम्मू आणि काश्मीरला असणारा विशेषाधिकार रद्द होणार आहे.
अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरचे द्विभाजन करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार लडाख आणि जम्मू आणि काश्मीर केद्रशासित प्रदेश करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार लडाखला विधानसभा असणार नाही, तर जम्मू आणि काश्मीरला विधानसभा दिल्लीप्रमाणे असेल. एकीकडे कलम ३५ अ वर हातोडा मारला जाईल अशी चर्चा होती, पण मुळ कलम असलेल्या ३७० वर हातोडा मारून निर्णायक शड्डू ठोकला.
COMMENTS