वेब टीम : अहमदनगर भगवानराव फुलसौंदर यांचे अध्यात्मिक कुटुंब आहे. शिवसेनेच्या माध्यामतून त्यांनी महापौर पदाची जबाबदारी सांभाळली. एखाद्या...
वेब टीम : अहमदनगर
भगवानराव फुलसौंदर यांचे अध्यात्मिक कुटुंब आहे. शिवसेनेच्या माध्यामतून त्यांनी महापौर पदाची जबाबदारी सांभाळली. एखाद्याची राजकीय तपस्या संपविण्याचे कुटील राजकारण या माध्यमातून पुन्हा समोर आले असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केला आहे.
दरम्यान, फुलसौंदर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करुन ते गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी माजी महापौर सुरेखा कदम यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.
संभाजी कदम म्हणाले की, या प्रकरणात निश्चित राजकारण आलेले आहे. शहरात काही भागांसह बुरुडगाव रोड भागात काही टोळ्या सक्रीय आहेत. या टोळ्या तेथील नागरिक, प्लॉटधारक, बंगले धारकांना, व्यापार्यांना बांधकाम करण्यापासून त्रास देतात. काही विशिष्ट नेते मंडळी त्यांच्याशी संगनमत करुन संधान साधतात. त्यातून हा प्रकार तर झालेला नाही ना? असा सवालही त्यांनी केला.
या संदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे व सर्व नगरसेवक, पदाधिकारी पोलिस अधिक्षकांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसैनिकांना सातत्याने गोवण्याचा प्रकार अशा माध्यमातून सुरू आहे. ज्यांना शिवसेनेला कमी दाखवून राजकारण करायचे तेच असे प्रकार करतात, असा आरोपही संभाजी कदम यांनी केला आहे.
भगवान फुलसौंदर यांच्या प्रकरणात आत्ताच अधिकार्याची नियुक्ती करुन चौकशी करावी, असेही ते म्हणाले.
COMMENTS