वेब टीम : दिल्ली भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगाला त्यांचा राष्ट्रीय पक्ष दर्...
वेब टीम : दिल्ली
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगाला त्यांचा राष्ट्रीय पक्ष दर्जा मागे न घेण्याचे आवाहन करत कामगिरी सुधारण्यासाठी नव्याने संधी देण्याची मागणी केली.
या तिन्ही पक्षांनी आयोगापुढे ‘आम्ही जुने पक्ष आहेत आणि आम्ही राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
म्हणूनच, केवळ अलीकडील कामगिरीवर आमचा दर्जा ठरू नये’ अशी मागणी केली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या जोरावर त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मागे का घेऊ नये यासंदर्भात निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
सोमवारी या पक्षांनी वैयक्तिक सुनावणीसाठी आयोगासमोर हजेरी लावली होती.
भाकप, बसपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला २०१४च्या लोकसभा निवडणुकांनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याचा धोका निर्माण झाला होता.
परंतु २०१६मध्ये आयोगाने पाच ऐवजी प्रत्येक दहा वर्षांनी राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय व राज्य दर्जाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याने या पक्षांना दिलासा मिळाला.
१९६८ सालच्या निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेशानुसार लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांतील मतदानापैकी किमान सहा टक्के मते मिळवल्यास एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखले जाऊ शकते आणि या व्यतिरिक्त लोकसभेत कमीतकमी चार सभासद असावे लागतात.
आत्तापर्यंत इंडियन नॅशनल कॉंग्रेस (आयएनसी), भाजपा, बसपा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, टीएमसी, राष्ट्रवादी आणि मेघालयातील नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.
COMMENTS