वेब टीम : दिल्ली देशातील झुंडबळींविरोधात आवाज उठवणाऱ्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या बॉलिवूडसह अन्य क्षेत्रांमधील जवळ...
वेब टीम : दिल्ली
देशातील झुंडबळींविरोधात आवाज उठवणाऱ्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या बॉलिवूडसह अन्य क्षेत्रांमधील जवळपास ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात इतिहासकार रामचंद्र गुहा, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विख्यात दिग्दर्शक व अभिनेत्री अपर्णा सेन यांच्यासारख्या अनेक मान्यवरांचा समावेश आहे. देशात झुंडबळींच्या घटनेत वाढ झाली असून ही चिंतेची बाब आहे, अशा आशयाचे खुले पत्र या ५० जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते.
देशभरात अनेक ठिकाणी झुंडबळींच्या घटना घडल्या आहेत. तसेच ‘जय श्रीराम’चा नारा देण्यासाठी दबाव आणत तरुणांना मारहाण केल्याच्या घटना घडल्याचेही समोर आले आहे.
सुधीर कुमार ओझा यांनी या मान्यवरांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २० ऑगस्ट रोजी ऑर्डर पास केली होती. माझी याचिकाही दाखल करून घेण्यात आली. त्याची पावती पोलीस स्टेशनमध्ये सादर करत या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे’, अशी माहिती याचिकाकर्ते सुधीर कुमार ओझा यांनी दिली आहे.
काय होते पत्र
बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुलै महिन्यात खुले पत्र लिहिले होते. मोदींना पत्र पाठवून झुंडबळींच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनवावा आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी कायद्यात तरतूद करण्याची मागणी करण्यात आली होती. आपले संविधान भारत ‘धर्मनिरपेक्ष गणराज्य’ असल्याचं सांगते. आपल्या देशात प्रत्येक धर्म, समाज, लिंग, जातींना एकसमान अधिकार आहेत. दलित, मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक समाजाविरोधात होणारे लिंचिंग थांबवणे आवश्यक आहे, असे या पत्रात नमूद केले होते. पंतप्रधानांनी या घटनांवर केवळ टीका करून चालणार नाही तर कायद्यात बदल करावा व आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी कडक पावलं उचलावीत अशी मागणी या मान्यवरांनी पत्राद्वारे केली होती.
ओझा म्हणतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणाऱ्या व त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या ५० जणांविरोधात मी याचिका दाखल केली होती. देशाचे नाव बदनाम करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी यांनी चांगले काम करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. देशद्रोह, सार्वजनिक ठिकाणी चुकीची माहिती पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे, शांतता भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS