वेब टीम : अहमदनगर नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्यात य...
वेब टीम : अहमदनगर
नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिला आहे.
नगर शहराच्या हद्दीतून जाणारा नगर-मनमाड महामार्ग अत्यंत खराब झाला आहे. त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची गरज आहे. नगर शहर व नागापूर एमआयडीसीला जोडणारा हा महामार्ग असून येथून दररोज हजारो वाहने जातात.
एमआयडीसीमध्ये जाणार्या कामगारांना सुद्धा याच महामार्गाचा उपयोग करावा लागतो. पत्रकार चौक ते एमआयडीसीपर्यंत अनेक ठिकाणी हा महामार्ग खराब झाला आहे. पत्रकार चौकाजवळ मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचत आहे. याशिवाय प्रेमदान चौक ते सावेडी नाका या दरम्यान असणार्या नाल्यावरील पुलाजवळ खड्डे पडले आहेत.
मुरुम टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नगर शहरामध्ये सातत्याने पाऊस हजेरी लावत असल्यामुळे येथे चिखल झाला आहे. याशिवाय सावेडी नाका, बोल्हेगाव फाटा, अशा विविध ठिकाणीही महामार्गावर खड्डे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
त्यातच रात्रीच्या वेळी या महामार्गावरील बहुतांश पथदिवे नादुरुस्त झाल्यामुळे बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या अंधारात येथून प्रवास करणे अधिकच जोखमीचे झाले आहे. महामार्गावर असणारे खड्डे, अंधार यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून लवकरात लवकर या महामार्गाची दुरुस्ती करून येथील पथदिवेही सुरू करण्याची आवश्यकता आहे.
यासंदर्भात आ. संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू, उपअभियंता संजय गायकवाड यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी संभाजी पवार, गजेंद्र दांगट, सारंग पंधाडे आदी उपस्थित होते.
COMMENTS