वेब टीम : मुंबई शरद पवारांच्या संमतीशिवाय अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज स...
वेब टीम : मुंबई
शरद पवारांच्या संमतीशिवाय अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. स्वतः शरद पवार यांनी ट्विट करून हा निर्णय अजित पवारांचा असल्याचे सांगितले आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार असं वाटत असतानातच, भाजपने राजकारणात मोठा भूकंप घडवला. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा मांडण्यास तयार झाली.
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत सहमती देखील झाली. परंतु आज सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला.
'विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होतं. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.
'मला पुन्हा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आभारी आहे. युतीला चांगला जनादेश मिळाला होता. पण शिवसेनेने आमची साथ सोडून दुसऱ्या पक्षासोबत गेली. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
अशा परिस्थितीत सरकार बनू शकतं नव्हतं. स्थिर सरकार देण्यासाठी अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राज्याला आम्ही स्थिर सरकार देऊ. राज्यातील आव्हानांना आम्ही चांगल सामोरं जावू,' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दोन्ही नेते उत्तम काम करतील याची खात्री आहे, असं पंतप्रधानांनी दिली आहे.
COMMENTS