वेब टीम : मुंबई ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये नाही पण, ४० टक्के मार्क मिळून तिघे एकत्र आले अन् १२० टक्के झाले, असा टोला विरोध...
वेब टीम : मुंबई
७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये नाही पण, ४० टक्के मार्क मिळून तिघे एकत्र आले अन् १२० टक्के झाले, असा टोला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधीपक्षनेते पदावर नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी या प्रस्तावावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सभागृहातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.
त्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्याची इच्छा होती पण काल दुर्दैवाने करता आली नाही, अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतोय, प्रेमाचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध राजकारणापलीकडे असतात. त्यांच्या मनात जनतेकरिता ज्या योजना केल्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी जे जनतेच्या हिताचे आहे त्यासाठी नक्कीच सहकार्य करु.
विरोधी पक्षात काम करणे हा आमचा डीएनए आहे, नियम पुस्तिकेच्या बाहेर मी कधीच गेलो नाही, संविधानाच्या आधारे काम करतो, सभागृहात जे मुद्दे काल मांडले ते संविधानाच्या आधारे मांडले. अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य करता येत नाही, पण त्यांच्या निर्णयाने समाधान झाले नाही म्हणून सभात्याग केला.
नियमाचे पुस्तक आणि संविधान यापुढे जाऊन कोणताही मुद्दा रेटून नेणार नाही असेही त्यांनी सांगितले. तसेच कुठल्याही महापुरुषाचे नाव घेण्यास मनाई नाही, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय हेच आहेत. छत्रपतींचे सेवक म्हणूनच आम्ही काम केले.
बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही नावे वंदनीयच आहेत. ही नावे कधीही घ्या, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात शपथ घेताना जी तरतूद केली आहे. त्यास अनुसरुन शपथ घ्यायला हवी होती. पण शपथ घेताना संविधानाची तरतूद पाळली नाही.
जेव्हा जेव्हा नियमाला धरुन काम होणार नाही. कितीही चिडला, कितीही रागवला तरीही मला दिलेली जबाबदारी ही नियमाला धरुन, संविधानाला अनुसरुन काम करत राहणार आहे, असे सांगत फडणवीसांनी भाजपावर केलेले आरोप फेटाळून लावले. त्याचबरोबर संविधानामध्ये इतकी शक्ती आहे. त्याची ताकद खूप मोठी आहे.
विरोधी पक्ष शत्रू नाही तर वैचारिक विरोध म्हणून आपण येथे बसलो, जे मित्र होते ते एकमेकांसमोर बसले आहेत, जे विरोधात होते ते सत्तेत बसले आहेत. लोकांनी जनादेश आम्हाला देऊनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, 70 टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही पण 40 टक्के मार्क मिळून तिघे एकत्र आले अन् 120 टक्के सांगितले असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्यांना लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही कधीही आवाज द्या, आमचा प्रतिसाद सकारात्मक असेल, जनतेच्या हिताविरोधात असेल तर सरकारवर आसूड ओढण्याचे काम नक्कीच करणार आहोत असे फडणवीस यांनी सांगितले.
COMMENTS