वेब टीम : अहमदनगर मागील 7 वर्षापासून विविध स्तरावर पाठपुरावा करुनही सावेडी गावठाणचा सिटी सर्व्हे होऊ शकला नाही. त्यामुळे सावेडी गावठाणा...
वेब टीम : अहमदनगर
मागील 7 वर्षापासून विविध स्तरावर पाठपुरावा करुनही सावेडी गावठाणचा सिटी सर्व्हे होऊ शकला नाही. त्यामुळे सावेडी गावठाणातील नागरिकांची मालमत्तांसंदर्भातील कामे रखडली आहेत. त्याचबरोबर सावेडी गावठाण आणि वैदुवाडीचा विकास खुंटला आहे. सिटी सर्व्हेचे काम त्वरीत सुरू करावे अन्यथा परिसरातील नागरिकांना घेऊन भूमिअभिलेख कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात नगरसेविका सौ. आशा कराळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.13) जिल्हाधिकारी आणि भूमिअभिलेखचे उपअधीक्षक गजानन पोळ यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी रुक्मिणी वाकळे, ज्योती लबडे, नंदा दंडवते, सुनीता कराळे, शीला बारस्कर, बबन बारस्कर, ज्योती कराळे, पार्वती दंडवते, महेश कराळे, कांचन गडाख आदी उपस्थित होते.
सदर निवेदनात म्हटले आहे की, उपनगर ज्या नावाने ओळखले जाते ते नाव आहे ‘सावेडी’. हे नाव सावेडी गावठाणमुळे मिळाले आहे. उपनगर सावेडी मात्र चांगल्या प्रकारे विकसित झाले आहे. परंतु सावेडी गावात मात्र सिटी सर्व्हे न झाल्याकारणाने नागरिकांचा व गावचा विकास खुंटला आहे. महापौर बाळासाहेब वाकळे व मी सभापती असताना जवळपास 19 लाख रू. महानगरपालिकेतून सिटी सर्व्हे करण्याकरिता वर्ग केले होते.
परंतु सिटी सर्व्हे होऊ शकला नाही. तसेच सिटी सर्व्हे नसल्या कारणामुळे गावकर्यांना प्रॉपर्टी कार्ड (सात बारा) मिळत नाही. त्यामुळे सावेडी गावातील नागरिकांचा विकास खुंटला आहे. लोकांच्या घरांचा व मिळकतीचे मुल्यांकन वाढत नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे होम लोन (कर्ज) मिळत नाही. सिटी सर्व्हे नसल्याने अंतर्गत रस्त्यांच्या हद्दीचे व घरांचे मोजमाप मिळत नाही. त्यामुळे अतिक्रमण होते व रस्ते छोटे होत आहेत.
तरी लवकरात लवकर सावेडी गावठाण व वैदुवाडीचा चालू असलेल्या शासनाच्या योजनेतून सिटी सर्व्हे व्हावा अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सौ. कराळे यांनी दिला आहे.
COMMENTS