वेब टीम : मुंबई महागाईची झळ सोसत असलेल्या मध्यमवर्गावर आता ‘महावितरण’च्या दरवाढीचाही फटका बसणार आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण र...
वेब टीम : मुंबई
महागाईची झळ सोसत असलेल्या मध्यमवर्गावर आता ‘महावितरण’च्या दरवाढीचाही फटका बसणार आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ने ५९२७ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला.
राज्यातील सुमारे दोन कोटी ५५ लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार असून दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर हा ८ टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस केली आहे. तीनशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने केली आहे.
राज्य वीज नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीजदर पद्धतीनुसार इतर वीजवितरण कंपन्यांसह महावितरणनेही आता २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या काळासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दाखल केला. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळासाठी ५.८० टक्के, २०२१-२२ मध्ये ३.२५ टक्के, २०२२-२३ मध्ये २.९३ टक्के, २०२३-२४ मध्ये २.६१ टक्के तर २०२४-२५ मध्ये २.५४ वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने दाखल केला.
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील सर्व महसुली मुख्यालयांच्या शहरांत महावितरणच्या प्रस्तावावर सुनावणी होईल. त्यात ग्राहक संघटनांना व इतरांना हरकती घेता येतील.आता राज्य वीज नियामक आयोग प्रत्यक्षात किती दरवाढ मंजूर करतो याकडे लक्ष असेल.
COMMENTS