वेब टीम : मुंबई राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. ...
वेब टीम : मुंबई
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही.
या सर्वांना सोमवारपासून मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून एकावेळी एका बसमधून केवळ २२ प्रवाशांनाच गावाला जाता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली.
१७ मेपर्यंतच ही सुविधा असेल, असे ते म्हणाले.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक मजूर, विद्यार्थी आणि इतर लोक अडकून पडले आहेत.
त्या सर्वांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी या लोकांनी २२ जणांची एक यादी करावी.
शहरातील लोकांनी ही यादी पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी.
त्यात त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायचं आहे, याची माहिती नोंदवायची आहे.
२२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण सांगतील, त्यानंतर डेपोत येऊन बसमधून गावाला जायचे आहे.
प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्याची स्वत:च व्यवस्था करावी,असे ना. अनिल परब यांनी सांगितले.
एसटीत प्रत्येक सीटवर एकच प्रवासी असेल.
मास्क लावून आलेल्या प्रवाशांनाच एसटीत प्रवेश असेल, कुणीही पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात परवानगी मिळावी म्हणून गर्दी करू नये, गावाकडे पोहोचल्यानंतर या प्रवाशांची तपासणी करायची की नाही याचा निर्णय संबंधित नोडल अधिकारीच घेतील असेही त्यांनी सांगितले.
COMMENTS