वेब टीम : मुंबई कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्षनेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतल...
वेब टीम : मुंबई
कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्षनेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल.
सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता.
आता मेअखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल, असेही ते म्हणाले.
ते आज विरोधी पक्षनेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.
यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोनाविषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत, असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसेप्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यांतून सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, आज कोरोनाशी मुकाबला करीत असताना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.
ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे.
माझे आपल्याशी मधूनमधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सूचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो.
त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो. केंद्र सरकारसुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे.
मग ते पंतप्रधान, गृहमंत्री असो किंवा केंद्रीय आरोग्यमंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात.
तसेच आत्तापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण प्रसंगी टीका करीत असाल; पण त्यात आपला उद्देश उणिवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करणे असा असतो.
आपण केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या वाढली नाही; मात्र मेअखेरपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे; मात्र बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत.
आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. व्हेंटिलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे.
परराज्यातील नागरिकांनाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत.
राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणेकरून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्रीय संस्था, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना आम्ही आयसीयू बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
मुंबईतूनदेखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्समध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे. तेथील लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
COMMENTS