वेब टीम : अहमदाबाद जवळपास ७५ वर्षांहून अधिक काळ अन्नपाण्याशिवाय जिवंत राहण्याचा दावा करणाऱ्या योगी प्रल्हाद जानी ऊर्फ चुनरीवाला माताजी ...
वेब टीम : अहमदाबाद
जवळपास ७५ वर्षांहून अधिक काळ अन्नपाण्याशिवाय जिवंत राहण्याचा दावा करणाऱ्या योगी प्रल्हाद जानी ऊर्फ चुनरीवाला माताजी यांचे मंगळवारी सकाळी गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात देहावसान झाले.
ते ९० वर्षांचे होते. गुजरातमध्ये त्यांचे असंख्य भक्त आहेत.
गांधीनगर जिल्ह्यातील चराडा या आपल्या मूळ गावी प्रल्हाद जानी यांनी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या शिष्यांनी दिली.
देवी माता मला जिवंत ठेवते, त्यामुळे मला अन्न-पाण्याची गरज पडत नाही, असा दावा ते सातत्याने करत असत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी काही वेळ आपल्या मूळ गावी घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्यानुसार त्यांना चराडा गावी नेण्यात आले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांनी याठिकाणी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या भक्तांना शेवटचे दर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव बनासकांठा जिल्ह्यातील त्यांच्या आश्रमात ठेवण्यात आले आहे.
गुरुवारी त्यांना आश्रमातच समाधी दिली जाणार आहे.
अंबिका देवीचे निस्सीम भक्त असलेले जानी नेहमी हिरव्या रंगाची ओढणी वापरत आणि महिलांप्रमाणे राहत असत.
त्यामुळे त्यांना 'चुनरीवाला माताजी' असे नाव पडले होते. जवळपास ७६ वर्षे आपण अन्न-पाण्याशिवाय जिवंत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
त्यांच्या भक्तांनुसार त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी अन्न-पाणी त्यागले होते.
२०१० साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी संबंधित डिफेंस इ्स्टिटट्यूट ऑफ फिजियोलॉजी ॲण्ड एलाइड सायन्ससेसच्या (डीआयपीएएस) वैज्ञानिकांनी व संबंधित डॉक्टरांनी जानी यांच्या दाव्यामागील सत्य शोधण्यासाठी त्यांचे १५ दिवस निरीक्षण केले होते.
त्यांच्या शरिरात अन्न-पाण्याशिवाय जुळवून घेण्याचे विशेष सामर्थ्य असल्याचे डीआयपीएएसने नंतर म्हटले होते.
COMMENTS