वेब टीम : मुंबई निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. याचा फटका मुंबईला मोठ्या प्रमाणात बसणार अशी शक्यता वर्तवली जात होती...
वेब टीम : मुंबई
निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. याचा फटका मुंबईला मोठ्या प्रमाणात बसणार अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र मुंबईचा संभाव्य धोका टळला आहे.
मात्र असे असले तरी, बुधवारी सांताक्रूझ येथे उपनगराच्या शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील चाळीत सिमेंट ब्लॉक खाली पडल्याने एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सांताक्रूझ (पूर्वेकडील) येथील डावरी नगर परिसरातील सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या या घटनेत तीन झोपड्यांचे नुकसान झाले.
तर रायगड जिल्हयात आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली.
जोरदार पाऊस आणि उंचच उंच लाटांमुळे एक जहाज भरकटले गेले होते.
परंतु, या जहाजावर अडकलेल्या १० नाविकांची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी समुद्रकिनारी असलेल्या रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सुमारे १५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले.
यात 4 जण जखमी झाले असले तरी कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.
जिल्हा प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करण्यास तात्काळ सुरूवात केली असून नुकसान भरपाईची रक्कम दोन दिवसात शासकीय नियमांप्रमाणे देण्यात येणार आहे.
हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
COMMENTS