वेब टीम : मुंबई “छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राही...
वेब टीम : मुंबई
“छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.
अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील,
पण ही जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत ती जर आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही.” अशा शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
सत्ताधारी ठाकरे सरकार शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्ता भोगत आहेत.
मात्र, गड-किल्ल्याकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही.
गड-किल्ल्याकडे दुर्लक्ष करत महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना सरकारकडून जाणीवपूर्वक अधिक महत्व दिले जात आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
राजू पाटील म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गड-किल्ल्यांची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारने एखादे स्वतंत्र मंडळ तयार करावे, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
तसेच, शिवाजी महाराजाचे स्मारक समुद्रात बांधता येत नसेल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधा.
महाराजांचा त्या किल्ल्यावर वावर होता हे सांगणारे अनेक पुरावे आहेत.
तिथे त्यांचे राज्यातील एकमेव मंदिर आहे.
मात्र सत्ताधारी राजकारणी लोकांच्या भावनेशी खेळत महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत.
त्यापेक्षा किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठिशी उभे रहा.
स्मारके लोकसहभागातून झाली पाहिजे हे यापूर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंटमधून मागणी केल्याचेही पाटील यांनी राज्य सरकारला सांगितले आहे.
COMMENTS