वेब टीम : पुणे मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाचे सातत्य कायम आहे. बुधवार आणि गुरूवारी मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,...
वेब टीम : पुणे
मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाचे सातत्य कायम आहे.
बुधवार आणि गुरूवारी मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
या पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणचे रस्ते उखडले आहेत. तर काही भागातला जनसंपर्क तुटला आहे.
राज्यात मान्सून सक्रीय असल्याने आणखी दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.
तेलंगणा परिसर, आंध्र प्रदेशची किनारपट्टी अतसेच बंगालच्या उपसागरात चक्रकार वार्याची स्थिती निर्माण झाली आहे.
तर दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वार्याचे जोरक्षेत्र आहेत. या सर्व कारणामुळे अरबी समुद्रावर बाष्पाचा पुरवठा होत आहे.
त्यामुळेच राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणातील रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, चिपळून, देवगड, कणकवली या भागात 60 ते 80 मि.मी. पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रातील शिरूर, नेवासा, सोलापूर, राहुरी, सांगोला, गगनबावडा, पाथर्डी आदी भागात 70 ते 110 मि.मी. पाऊस पडला आहे.
तसेच मराठवाड्यात निलंगा, देवणी, तुळजापूर, उस्मानाबाद, औंढा नागनाथ, अमदपूर, अंबेजोगाई भागात 40 ते 60 मि.मी. पाऊस पडला.
विदर्भातील मालेगाव, वाशिम, भामरागड, गडचिरोली भागात 40 ते 60 मि.मी. पाऊस पडला. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे.
त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे. घाटमाथा विभागातही मुसळधार पाऊस कायम आहे.
तसेच मुंबई परिसरात ढगाळ वातावरण असून काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
COMMENTS