वेब टीम : मुंबई सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाचे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते द...
वेब टीम : मुंबई
सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाचे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक निधी घेतला असून शिवसेनेला सर्वांत कमी निधी दिल्याची टीका केली होती. मात्र आज अजित पवार यांनी आकडेवारीच सादर करत फडणवीसांचा हा दावा फेटाळून लावला.
ज्यावेळी अर्थसंकल्प तयार करतो तेव्हा त्यावर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची अंतिम सही असते. संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मंजुरी देत असते. त्यामुळे सरकार आणण्यासाठी आगीत काडी टाकण्याचे काम करू नका, असे म्हणत अजित पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.
अजित पवार म्हणाले, कुठलेही सरकार चालवायचे, टिकवायचे, पुढे न्यायचे म्हटले तर भेदभाव करून चालणार नाही. भेदभाव केला तर सरकार चार दिवसही चालणार नाही. त्यामुळे असा प्रयत्न शिवसेनाही करत नाही, राष्ट्रवादीही करत नाही आणि काँग्रेसही करत नाही. माझ्या खात्याकडची रक्कम वेतन आणि निवृत्तिवेतनावरही जाते. कर्जाचं व्याज भरण्यावरही जाते.
हे सर्व घातलं राष्ट्रवादीच्या नावावर. असं कुठं असतं का? आशिष शेलार साहेब ठीक आहे. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. पण असलं काही तरी सांगून कुठं तरी आगीत काडी घालण्याचं काम करू नका, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातील योजना या अर्थसंकल्पात होत्या असे विरोधी पक्ष बोलत होते. मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टीका करत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी ‘सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे, या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली.
राज्य अडचणीतून पुढे जात असताना राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसुली तूट कशी कमी करता येईल, नागरिकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही, असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.