गट- गणांच्या रचनेचा संभ्रम कायम ! शासनाच्या निर्णयाने इच्छुकांचा जीव टांगणीला विद्यमान पदाधिकारी, सदस्यांचे काऊंटडाऊन वेगात मिनी मंत्रालय...
गट- गणांच्या रचनेचा संभ्रम कायम !
शासनाच्या निर्णयाने इच्छुकांचा जीव टांगणीला
विद्यमान पदाधिकारी, सदस्यांचे काऊंटडाऊन वेगात
मिनी मंत्रालयावर सहा महिने 'प्रशासकीय राजवट'
अहमदनगर प्रतिनिधी :
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर जिल्हा परिषेदाचा गट-गणांचा कच्चा आराखडा प्रशासनाने तयार करत मंजुरीसाठी पाठविला. मात्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार तो कायम राहणार की पुन्हा नव्याने केला जाणार? याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
दरम्यान २१ मार्चला विद्यमान सदस्यांचा कार्यकाळाची मुदत संपुष्टात येणार असून त्यानंतर प्रशासकाची नियुक्ती केली जाणार आहे. आरखडा, आरक्षण या प्रक्रियेला होणारा विलंब पाहता किमान सहा महिने जिल्हा परिषदेवर प्रशासक राज असेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण वाढल्याने नव्याने होणारी गट-गण रचना कशी असेल? या प्रश्नाने विद्यमान तसेच इच्छुकांची राजकीय घालमेल सुरू होती. त्यातच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटल्याने चिंतेत भर पडली, मात्र शासनाने नुकत्याच पारीत केलेल्या एका विधेयकाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाने या अध्यादेशासोबत अंतिम झालेल्या प्रभाग रचना रद्द केल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेच्या ८५ आणि पंचायत समितीचा १७० गणांचा कच्चा आरखडा तसाच राहणार की पुन्हा नव्याने केला जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
विद्यमान सदस्यांचा कार्यकाल २० मार्च अखेर संपुष्टात येणार आहे. मुदतीत निवडणूक होणार नसल्याने जिल्हा परिषदेवर आता प्रशासक नियुक्ती होणार आहे. त्यामुळे विद्यमान सदस्य मंडळींचे काऊंटडाऊन वेगात सुरू असून, सत्तेतील ते अखेरचे १० दिवस सर्वांसाठीच धावाधावीचे असणार आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अनेकांनी तयारी केली होती. त्यासाठी विद्यमान सदस्यांनीही कामांचे नारळ फोडून जणू प्रचारालाही सुरुवात केली होती.
मात्र, आता सहा महिने पुढेनिवडणूका जाणार असल्याने अनेकांच्या भ्रमनिराश झाला आहे.
प्रशासक म्हणून 'सीईओ' कारभारी
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागून नवीन पदाधिकारी सभागृहात येत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून सीईओ राजेंद्र क्षीरसागर हे कारभार पाहणार आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत.
गट-गण प्रारूप लवकरच
नगर जिल्हा परिषदेत १२ गट आणि २४ गण वाढून यंदा ८५ गट आणि १७० गण निर्माण झाले आहेत. त्याचा प्रारुप आराखडा तयार होऊन तो निवडणूक आयोगाकडे सादरही केला गेला. मात्र तो आरखडा अंतिम झालेला नसल्याने तो पुन्हा तयार करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे प्रारुप आराखडा रद्द होणार नाही, तो लवकरच प्रसिद्ध होईल, अशी माहिती 'महसूल कडून मिळाली आहे.
पूर्वी एकदा पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली होती. मात्र, ७३ व्या घटना दुरुस्तीने ती तरतूद रद्द केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी सभागृहात येईपर्यंत प्रशासक काम पाहतील. प्रशासक कालावधी ओबीसी आरक्षणाच्या अंतिम निर्णयावरच अवलंबून असणार आहे.
सुप्रिया झावरे पाटील (जि.प. सदस्य अहमदनगर)
..