रेशन घोटाळ्यातील तिघा आरोपींचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला वडनेर येथील प्रकरण; न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाला गुन्हा पारनेर/प्रत...
रेशन घोटाळ्यातील तिघा आरोपींचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला
वडनेर येथील प्रकरण; न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाला गुन्हा
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वडनेर येथील स्वस्त धान्य दुकानातील शासकीय धान्य वितरण गैरव्यवहार केल्या प्रकरणातील तिघा आरोपींचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला.
वडनेर येथील स्वस्त धान्य दुकानदाराने शासकीय धान्य वितरणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. वडनेर येथील दत्तात्रय पवार यांनी येथील स्वस्त धान्य दुकानदार भागा खंडू बाबर यांना काळ्याबाजारात रेशनचा गहू विकताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पुढे या दुकानदाराने तहसीलदार व तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याशी संगनमताने हे प्रकरण दडपले होते. तक्रार दडपल्याची तक्रार पवार यांनी शासन प्रशासानाकडे केली. मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर पवार यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन याचिका दाखल केली होती.
पुढे न्यायालयाने याप्रकरणी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिल्याने धान्य दुकानदार भागा खंडू बाबर व चोरीचा माल विकत घेणारे भाऊसाहेब विठ्ठल गोरडे, रामदास मारुती कापसे यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद पारनेरचे पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी दिली होती. यातील आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
या जामीन अर्जात तक्रारदार असणारे दत्तात्रय पवार यांनीही हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी आरोपींचा जामीन फेटाळला. स्वस्त धान्य मिळणे हा गरीबांचा हक्क आहे. गरीब लोक त्यांच्यावरील अशा अन्यायावर आवाज उठवू शकत नाहीत. जर त्यामध्ये कुणी घोटाळा करत असेल तर त्यांची गय नको, असे मतही न्यायालयाने आदेशात व्यक्त केले आहे. तक्रारदार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नवनाथ गर्जे यांनी बाजू मांडली.
COMMENTS