टँकर घोटाळाप्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषण गावातील भ्रष्टाचाराबाबत अण्णा हजारेंचे मौन पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील जेष...
टँकर घोटाळाप्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषण
गावातील भ्रष्टाचाराबाबत अण्णा हजारेंचे मौन
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकाऱ्यांनी केलेला टँकर घोटाळा प्रशासनावर दबाव आणून दडपला जात असल्याचा आरोप करत, लोकजागृती सामाजिक संस्थेने राळेगण सिध्दीत प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली आहे. सोमवार ११ एप्रिल पासून येथे उपोषण चालू करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी दिली.
याबाबतचे पत्र त्यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्रामपंचायत राळेगण सिद्धी यांना दिले. अहमदनगर जिल्ह्यात दोन वर्षापुर्वी टँकर घोटाळा झाला होता. तेव्हापासून लोकजागृती सामाजिक संस्था याबाबत प्रशासन व न्यायालयात लढा देत होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने घोटाळेबाज कंपनी विरोधात शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु गुन्हा दाखल झाला असला तरी तो फार गंभीर स्वरूपाचा नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न राळेगणसिद्धीतील प्रमुख घोटाळेबाजांनी चालवलेला आहे. गुन्हा दाखल झालेल्या साई सहारा कंपनीचे संचालक हे अण्णा हजारे यांचे आजी - माजी सहकारी असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन ते प्रशासनावर दबाव आणून घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे आता अण्णांनीच या घोटाळ्यांच्या सखोल चौकशीची मागणी शासनाकडे करावी, राळेगणला ग्रामसभा बोलवावी, घोटाळेबाज सहकाऱ्यांचे राजीनामे घ्यावेत, साई सहाराच्या संचालकांच्या मालमत्तांची चौकशी करावी, घोटाळेबाजांना अण्णांच्या जवळ जाण्यास प्रतिबंध घालावा, यातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करावी अशा विविध मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत. लोकजागृतीच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कार्यकर्त्यांनी पिंपळनेरला गेल्या आठवड्यात आत्मक्लेश आंदोलन केले होते, परंतु तरीही राळेगण सिद्धी परिवाराने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.
देशातील कोणत्याही भ्रष्टाचार वर राळेगणच्या ग्रामसभेत चर्चा होते, ठराव होतात, निर्णय होतात तर मग त्यांच्याच गावातील भ्रष्टाचाराची चर्चा का होत नाही, असा सवाल करत लोकजागृती सामाजिक संस्थेने राळेगण-सिद्धी परिवारा विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. देशभरात भ्रष्टाचाराचे धडे देणाऱ्या राळेगण सिद्धीतच न्याय मिळत नसल्यामुळे आमच्यावर उपोषण करण्याची दुदैवी वेळ येत आहे. असे संस्थेचे सचिव बबन कवाद यांनी सांगितले.
न्याय न मिळाल्यास त्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषणाचे हत्यार वापरा असे नेहमी सांगणाऱ्या अण्णा हजारेंच्या गावातच उपोषण होत असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आण्णांचा भेटीला नकार..
आज आम्ही लोकजागृती सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राळेगण सिद्धीला जावून आण्णांना उपोषणाबाबत माहीती देणारे पत्र घेवून गेलो असता अण्णांनी भेटण्यास नकार दिला. त्यानंतर आम्ही उपोषणाचे पत्र कार्यालयात जमा केले आहे.
- रामदास घावटे
(अध्यक्ष लोकजागृती संस्था)
COMMENTS