बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये पोखरीत गायी व वासरू ठार बिबट्याच्या उपद्रव वाढल्याने बंदोबस्त करा : सतीश पवार शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पारन...
बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये पोखरीत गायी व वासरू ठार
बिबट्याच्या उपद्रव वाढल्याने बंदोबस्त करा : सतीश पवार
शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील पोखरी येथील कडा परिसरात चंद्रभान तुकाराम पवार यांच्या मालकीच्या गायीवर बिबट्याने सोमवारी रात्री हल्ला केला तसेच विठ्ठल लक्ष्मण पवार यांच्या एक वर्षाच्या वासरावरही बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या तीन आठवड्याच्या काळात मेंढी शेळीवर व आता गायीवर बिबट्याने हल्ला केला असून शेतकरी व मेंढपाळ समाजामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाच्या वतीने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी मा. ग्रामपंचायत सदस्य सतीश पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पोखरी गावात पिंजरा आणण्यात आला असून तो वनविभागाच्या वतीने लावण्यात आला नाही. या अगोदर पोखरी येथील कडा परिसरात संपत वाघ यांच्या एका शेळीवर हल्ला केला असून ती या हल्ल्यात ठार झाली आहे. त्यामुळे पिंजरा लावून या त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या दोन्ही गावातील ग्रामस्थ आता करू लागले. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असताना पाण्याचे व भक्ष्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने त्यांनी मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे थेट गोठ्यात जाऊन शेळ्या व मेंढ्या यांच्यावर हल्ला करण्याच्या घटनेचा पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. पोखरी येथे चार ते पाच दिवसांपूर्वी कैलास फकीरा वाघ यांच्या एका मेंढी वर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये ती मेंढी ठार झाली होती. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यावर हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालली असून याठिकाणी पिंजरा लावूनही या पिंजऱ्यात आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोखरी परिसरात बिबट्या वारंवार पाळीव जनावरांवर हल्ला करत असून यामध्ये अनेक शेळ्या मेंढ्या व गायींवर त्याने हल्ला केला आहे. त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा
सतीश पवार
(मा. ग्रामपंचायत सदस्य, पोखरी)
पोखरी परिसरामध्ये बिबट्या वारंवार शेतकऱ्यांना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. त्याचा उपद्रव थांबविण्यासाठी वन विभागाने त्वरित पिंजरा बसवून बिबट्या जेरबंद करावा ग्रामस्थांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यावी.
पंकज खैरे
(स्थानिक ग्रामस्थ)