पळवेत विजेचा खेळखंडोबा; आठ दिवसात बसवला दुसरा ट्रांन्सफार्मर जळका ट्रांन्सफार्मर देऊन कोण खातय मलई, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा पारनेर प्रत...
पळवेत विजेचा खेळखंडोबा; आठ दिवसात बसवला दुसरा ट्रांन्सफार्मर
जळका ट्रांन्सफार्मर देऊन कोण खातय मलई, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
पारनेर प्रतिनिधी :
दहा दिवसापासून पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक येथील गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून महावितरण कडून डिपी पे डिपी बसवण्याचा प्रताप केला जात आहे. गेली आठ दिवसात महावितरण कडून दुसरा ट्रांन्सफार्मर बसविण्यात आला परंतु अद्याप निम्मा गाव अंधाराच्या विळाख्यात आहे. दि ८ पर्यंत महावितरण कडून उपाय योजना केल्या नाही तर मंगळवार दि.९ रोजी महावितरण कंपनी विरोधात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा चेअरमन तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गंगाराम कळमकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
पळवे गावात महावितरणच्या वतीने गावठाणात गेले चौदा ते पंधरा वर्षांपूर्वी ट्रांन्सफार्मर बसविण्यात आले. मात्र यानंतर लोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेली दोन वर्ष कोरोना महामारीने थैमान घातले होते. या काळात देखील महावितरण कडून अव्वा ची सव्वा विजबिले देण्यात आली. येवढे होऊन देखील ग्रामस्थांनी आजपर्यंत विजबिल नियमित भरले आहेत. मात्र दिवसातून अनेक वेळा विज गायब होते. सद्या पावसाचे दिवस असल्याने सर्वत्र मच्छर झाले आहेत. विज नसल्याने रात्र रात्र ग्रामस्थांना जागून काढावी लागत आहे. याची महावितरणकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
लोड अधिक वाढला असताना देखील महावितरण कडून ६३ केव्हीचा ट्रांन्सफार्मर बसवले जाते. गेली पंधरा वर्षांत सुमारे नव्वद ते शंभर ट्रांन्सफार्मर महावितरणकडून बसविण्यात आले. विजेचा कमी अधिक दाबाने रोहीत्र जळते. रोहित्र जळाले की महावितरणकडून आठ दिवसांचा कालावधी लागतो. त्यात बसवलेला नविन रोहित्र चालेल किंवा नाही याची शाश्वती नसते. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. महावितरणने आता ग्रामस्थांचा अंत न पहाता गावठाणात मोठा १०० केव्हीचा रोहित्र बसवावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील गंगाराम कळमकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यात जळालेल्या अवस्थेत रोहीत्र बसविण्यात महावितरणची आघाडी
वेळेत विजबिल भरून देखील महावितरणकडून नागरिकांना पाहीजे त्या सुविधा दिल्या जात नाहीत, गेली पन्नास ते साठ वर्षांपूर्वी सुपा, पारनेर सबस्टेशनमधून गावोगावी तारा ओढण्यात आल्या आहेत.त्या निझूर झाल्या असून विजेचा लपंडाव सुरूच आहे. गावठाण रोहीत्र जळाल्यानंतर ते महावितरकडून तातडीने बसविण्यात यावेत अशी तरतूद असताना देखील महावितरणकडून खाजगी कंपन्यांमार्फत रोहीत्र दुरूस्ती करून घेतली जातात.यादरम्यान अनेक रोहत्र बसविल्यानंतर नादुरुस्त झाले असल्याचे समोर आले आहे.येवढे होऊन देखील महावितरण कडून जळालेले ट्रांन्सफार्म बसविण्याचा सपाटा तालुक्यात सुरूच आहे.