गणरायाच्या स्वागताला वरुणराजा धावला बळीराजा सुखावला; बाजरी पिकाला जीवदान पारनेर प्रतिनिधी : गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने ...
गणरायाच्या स्वागताला वरुणराजा धावला
बळीराजा सुखावला; बाजरी पिकाला जीवदान
पारनेर प्रतिनिधी :
गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाच्या अगमनाला वरुणराजा धावून आल्याने बळीराजा सुखावला आहे.या पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. बाजरीच्या पिकाला विशेषतः या पावसामुळे फायदा झाला आहे.
जून महिन्यापासून बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. परंतू हलक्याश्या झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. पुढे श्रावण महिन्यात मोठा पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु त्यावेळी देखील तुरळक पाऊस पडला त्यामुळे पिके जिवंत राहू शकली परंतु ओढे, नाले, विहिरी यांना पाणी आले नाही. हलक्या पावसावर मूग, वाटाणा, उडीद आदी पिके शेतकऱ्यांच्या कसेबसे हाताशी आली परंतु बाजरीची पिके कणसामध्ये दाना भरायच्या वेळी पाऊस नसल्याने बाजरी पिके सुकायला लागल्याने शेतकऱ्यांना चिंता होती.
गणेशोत्सवात पाऊस नक्की होईल या आशेने शेतकरी आकाशाकडे नजरा लावून होते. गणेशचतुर्थीच्या दिवशी बुधवारी गणरायाचे आगमन झाल्याच्या दिवशी सायंकाळी एक ते दीड तास पावसाने जोरदार बॅटिंग केली. तासभर चाललेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले. रात्रभर देखील रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसाने बळीराजाचे बाजरी पिकाला फायदा झाला असून ऐन बाजरीचे पीक पक्के होण्याच्या वेळी झालेल्या पावसाने बाजरी पिक जोमाने येणार आहे त्यामुळे बळीराजा आनंदला आहे.
गेले २ वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आली होती. यावर्षी कुठलेच निर्बंध नसल्याने सर्वत्र मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे. त्यामुळे गणेशभक्तांसह थोरा मोठ्यांमध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पहावयास मिळत आहे.
पावसाळ्याचे पाहिले ३ महिने संपले असून अद्याप ओढे नाले विहिरी यांना पाणी नाही. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव यामध्ये जोरदार पाऊस होऊन ओढे नाले तुडुंब भरले पाहिजेत तरच शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी उन्हाळभर पाणी पुरेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठाल्या पावसाची प्रतीक्षा असून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मध्ये जोरदार पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
शेतीमालाच्या बाजारभावसाठी गणरायाला साकडे
सध्या शेतीसाठी लागणारे खते, औषधे, बियाणे यांचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. त्याअनुषंगाने शेतमालाला मूलभूत बाजारभाव मिळाला पाहिजे. परंतु शेतीमालाला कवडीमोल बाजार भाव आहे.शेतकऱ्यांचे कांदे सडून चालले असून कांद्याला बाजारभाव नाही. तरकारी मालाला बाजार भाव नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या किमान दीड ते दोनपट हमीभाव सरकारने शेतकऱ्यांना द्यावा असे साकडे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी गणरायाला घातले आहे.
COMMENTS