अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा : सरपंच प्रकाश गाजरे तालुक्याच्या उत्तर भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान पारनेर...
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा : सरपंच प्रकाश गाजरे
तालुक्याच्या उत्तर भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान
पारनेर प्रतिनिधी :
सध्या सर्व दूर जोरदार पाऊस सुरू आहे ओढे-नाले तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी रात्री पारनेर तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील पोखरी, देसवडे, मांडवे खु., खडकवाडी, म्हसोबा झाप, कामटवाडी, वारणवाडी, कातळवेढा, पळसपुर, नांदूर पठार, पिंपळगाव रोठा, कारेगाव, कासारे, सावरगाव, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, वासुंदे, वडगाव सावताळ, तिखोल काकनेवाडी या ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एकीकडे समाधानाचे वातावरण असताना आती मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांनी शेती पिकाची पाहणी करून पीक पंचनामा करावा अशी मागणी म्हसोबा झाप चे सरपंच प्रकाश गाजरे यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके व तहसीलदार निवेदन देऊन केली आहे.
मांडओहळ परिसरात पिकांचे नुकसान..
मांडओहळ धरण क्षेत्रामध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु अति मुसळधार पावसाने परिसरामध्ये गुरेवाडी, गाढवे झाप, शिक्री, ठाकरवाडी, शिवजाळे, बोरवाक, शेलवाक, वाबळे मळा, कूरणवाडी, गोडसेदरा असलेली पिके पूर्णतः जमीनदोस्त झाली असून परिसरातील पिकांची त्वरित पंचनामे करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तसेच लवकरात लवकर शासन स्तरावर मांडओहळ परिसरातील पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी नेते किरण वाबळे व म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी केली आहे.
दरम्यान पारनेर तालुक्याच्या उत्तर भागांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सध्या काढणीला आलेली बाजरीचे पीक हे जमीनदोस्त झाले आहे. तसेच वाटाणा, मिरची, टोमॅटो, सोयाबीन, कांदा, कोबी, फ्लावर या पिकांचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत तसेच म्हसोबा झाप येथील शेतकरी संतोष हांडे यांच्या घराची सुद्धा या पावसामुळे पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु सतत अतिमुसळधार पाऊस असल्यामुळे जे पीक शेतामध्ये आहे त्याचेही आता नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने तातडीने या सर्व नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी निवेदन देऊन केली आहे.