वेब टीम : मुंबई काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी पटोले ...
वेब टीम : मुंबई
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी पटोले राज्यपालांना भेटणार आहेत.
काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःच याबद्दलची माहिती दिली आहे. त्याचबरोबर या सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केल्याने शिंदे गट आणि भाजपच्या (BJP)गोटात खळबळ उडाली.
महाराष्ट्रातील प्रकल्प ज्याप्रमाणे गुजरातला जात आहेत, त्याचप्रमाणे गुजरातचा डोळा मुंबईवर आहे. उद्या हे मुंबई देखील गुजरातला देतील असा गंभीर आरोपही पटोले यांनी केला.
शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राला उध्वस्त करत आहेत. दिवाळीच्या आनंद शिधामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पटोले यांनी केला.
राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
या सरकारचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत केली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी मदतीविना असल्याने तो टोकाचे पाऊल उचलत आहे. यामुळे हे सरकार बरखास्त करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे पटोले म्हणाले.