प्रतिनिधी : पंढरपूर कष्टकऱ्यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी दलितांना मंद...
प्रतिनिधी : पंढरपूर
कष्टकऱ्यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभे केले. सनातनी व्यवस्थेविरुद्ध ते मजबुतीने उभे राहिले. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकर्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी चळवळ उभी केली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.
साने गुरुजींनी विठ्ठल मंदिराचे दरवाजे दलितांना उघडे व्हावेत यासाठी तनपुरे महाराज मठात केलेल्या उपोषणाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तनपुरे महाराज मठात उभारण्यात आलेल्या साने गुरुजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे महाराज पुण्यतिथीनिमित्त पार पडला. या सोहळ्यात पवार यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी मंचावर हभप बद्रीनाथ तनपुरे महाराज, आमदार बबनराव शिंदे, पन्नालाल सुराणा, राजाभाऊ अवसक, माधव कारंडे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, संभाजी दहातोंडे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, उपेंद्र टण्णू, हभप भारत रामदास जाधव, हभप ज्ञानेश्वर बंडगर आदी सह मोठया संख्येने राष्ट्र सेवा दल सैनिक, छात्रभारती, वारकरी मंडळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, तो काळ देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा काळ होता. अशा काळात विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा देव असूनही त्यामध्ये लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या दलितांना प्रवेश नव्हता, त्यामुळे साने गुरुजींनी त्यावेळच्या मुंबई सरकारकडे पत्र लिहून मागणी केली. तसेच विठ्ठल देवस्थानच्या त्यावेळच्या पंच कमिटीकडे पत्रे लिहून आवाहन केले की सर्व माणसे देवाची लेकरे आहेत. या लेकरांना मंदिरात प्रवेश मिळावा. यासाठी शेवटी साने गुरुजींनी १ मे ते १० मे या काळात पंढरपुरात उपोषण केले. सनातनी व्यवस्थेविरुद्ध ते मजबुतीने उभा राहिले आणि मंदिर खुले झाले. चळवळीचे ठिकाण असलेल्या संत तनपुरे मठात त्यांचे स्मारक साकारले असून हे स्मारक या चळवळीची महती सांगणारे ठरेल. तनपुरे महाराज यांनीही समतेचा विचार सातत्याने जपला. ते लोकांच्या अंतरंगात आहेत.
यावेळी हभप बद्रीनाथ तनपुरे म्हणाले की, भाव तिथे देव आहे, मंदिरात देव आहेच, मात्र तो मंदिराच्या बाहेरही चराचरात आहे. संत नामदेवांनी हाच समतेचा विचार आणि वारकरी संप्रदायाची चळवळ भारतभर पोहोचवली. ७५ वर्षांपूर्वी संत तनपुरे महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केली आणि भारत जोडो चळवळ त्याकाळी रुजवली. पंडित नेहरूंसमोर त्यावेळी देशातील कष्टकऱ्यांच्या भुकेचा प्रश्न निर्माण झालेला असताना तनपुरे महाराजांनी संत गाडगेबाबांच्या आदेशाने पंढरपूरमध्ये अन्नदान चळवळ सुरु केली. पुढे समतेचा हा विचार समोर ठेऊन साने गुरुजींच्या आंदोलनासाठी मठात जागा दिली. त्यातून दलितांना मंदिर प्रवेश देणारे ऐतिहासिक आंदोलन झाले. वारकरी संप्रदाय हा पुरोगामी चळवळ आहे.
यावेळी आ. बबनदादा शिंदे म्हणाले की, त्याकाळी विठ्ठल मंदिरात विशिष्ट लोकांनाच प्रवेश होता, अशा कठीण काळात तनपुरे महाराजांनी साने गुरुजींना साथ दिली.
यावेळी श्रीची विठ्ठल सहकाराचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, यांनीही मनोगते व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत हभप अनंत बद्रीनाथ तनपुरे यांनी केले तर प्रास्ताविक स्मारक समितीचे प्रमुख राजाभाऊ अवसक यांनी केले. साने गुरुजी यांच्या स्मारकासाठी बद्रीनाथ तनपुरे यांनी मठात जागा देऊन आपली विचारांशी असलेली बांधिलकी कायम ठेवली असल्याचे अवसक म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशिकांत परचंडराव, श्रीरंग गायकवाड, दादासो रोंगे,अशोक क्षीरसागर, शिवाजी शिंदे ,नागेश आवताडे, महादेव (तात्या) कोळी, पत्रकार शिवाजी शिंदे, सारंग कोळी, मल्हारी पवार, डॉ. अनिल जोशी, श्री. कपिल डिंगरे, प्रकाश पोळ, दत्ता कोंडलकर, आणि अॅड. दत्ता तोडकरी, रजत अवसक, राजेंद्र पाचे, साई राम बनकर, बाळासाहेब कोलते यांनी परिश्रम घेतले. संदीप वाकचौरे यांनी सूत्रसंचालन केले.
COMMENTS