वेब टीम : दिल्ली भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) च्या शास्त्रज्ञांनी आपली दुसरी चांद्र मोहीम ‘चांद्रायन-२’ ला यशस्वीपणे पृथ्वीच्या ...
वेब टीम : दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) च्या शास्त्रज्ञांनी आपली दुसरी चांद्र मोहीम ‘चांद्रायन-२’ ला यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत पुढे नेणे सुरू केले आहे. २२ जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) १७० किमी व कमाल (एपोजी) ४५ हजार १४७५ किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते. याच कक्षेत असताना आज दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान यात यशस्वीरित्या बदल करण्यात आले. आता याची पेरिजी २३० किमी आणि एपोजी ४५ हजार १६३ किमी करण्यात आली आहे.
आता सहा ऑगस्टपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंनी चांद्रयान-२ च्या कक्षेला बदलले जाईल. २२ जुलैनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचण्यासाठी ‘चांद्रयान-२’ चा ४८ दिवसांचा प्रवास सुरू झाला आहे. श्रीहरिकोटा येथून झेपावल्याच्या १६.२३ मिनिटानंतर चांद्रयान -२ पृथ्वीपासून जवळपास १७० किमी उंचीवर जीएसएलव्ही एमके ३’ या प्रक्षेपकापासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरत होते.
चांद्रयान -२ अंतराळात २२ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंनी फिरत राहील. यानंतर १४ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत चंद्राकडे जाणाऱ्या लांब कक्षेतील प्रवास करेल. २० ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या कक्षेत पोहचेल. यानंतर ११ दिवस म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत ते चंद्राच्या चारही बाजूंनी फिरत राहील. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी विक्रम लॅण्डर ऑर्बिटरपासून वेगळे होईल आणि चंद्राच्या दक्षिणी ध्रुवाच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. पाच दिवसांच्या प्रवासानंतर ६ सप्टेंबर रोजी विक्रम लॅण्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल, यानंतर चार तासांनी रोवर प्रज्ञान लॅण्डरपासून निघून चंद्राच्या पृष्ठभागावर विविध प्रयोग करण्यासाठी उतरेल.
COMMENTS