वेब टीम : अहमदनगर नगर जिल्हा हा अवर्षण प्रवण जिल्हा असून, पर्जन्यमानातील अनियमितता, कमी पाऊस, पावसाच्या कालावधीतील मोठा खंड, नैसर्गिक आ...
वेब टीम : अहमदनगर
नगर जिल्हा हा अवर्षण प्रवण जिल्हा असून, पर्जन्यमानातील अनियमितता, कमी पाऊस, पावसाच्या कालावधीतील मोठा खंड, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकर्याचे उत्पन्न हे घटत आहे. परिणामी त्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असून, शेतकर्यांनी फळ, पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. त्याच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी नगर कृषी विभाग येथे डिजिटल पोमोग्रेनेट हाऊस उभारण्यात आले असून, त्यामध्ये शेतकर्यांना फळ, पीक विमा योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. 15 जुलैपर्यंत हे पोमोग्रेड हाऊस जिल्हा कृषी विभाग कार्यालयात राहणार असून, जास्तीत जास्त शेतकर्यांनी माहिती घेऊन फळ, पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी केले आहे.
अ.नगर कृषी कार्यालय येथे शेतकर्यांच्या माहितीसाठी हवामान फळ, पीक विमा योजनेवर आधारित पोमोग्रेनेट हाऊस उभारण्यात आले आहे. या विमा योजनेबद्दल शेतकर्यांना बजाज अलायंझ इन्शुरन्स कंपनीचे राज्याचे प्रमुख रजत धर व क्लस्टर व्यवस्थापक लोकेंद्र सिंग यांनी माहिती दिली. या हाऊसचे उद्घाटन श्री. नितनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी रवींद्र माळी, एडीसीसी बँकेचे विकास अधिकारी एस. बी. दरेकर, जिल्हा समन्वयक विनायक पवळे, संजय मेहेत्रे, बाळासाहेब आठरे, विनोद वाडेकर, नारायण करांडे आदी उपस्थित होते.
बजाज अलायंझ इन्शुरन्स कंपनीचे राज्याचे प्रमुख रजत धर म्हणाले की, हवामानावर आधारित फळ, पीक विमा योजनेत संत्रा, मोसंबी, पेरू, चिक्कू, डाळिंब, लिंबू या पिकांचा समावेश असून, महाराष्ट्रात अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, हिंगोली, परभणी, ठाणे, सोलापूर, लातूर, वाशीम, पालघर, बीड, जळगाव, सांगली, यवतमाळ या जिल्ह्यासाठी ही योजना लागू असून, शेतकर्यांनी योजनेच्या विहित मुदतीत ज्यांचे पीककर्ज कोणत्याही सहकारी सोसायटी, ग्रामीण किंवा व्यावसायिक बँकेकडून मंजूर झाले आहे. अशा सर्व शेतकर्यांना त्याचा लाभ घेता येईल. योजनेंतर्गत जिल्हा स्तरावरील अधिसूचित पिकांचे उत्पादन घेणार्यांना स्वतःच्या नावावर सात बारा असावा. बँकेचे बचत खाते असावे. त्याचे आधार कार्ड, पासबुक, पेरणीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करावी. विमा हप्ता सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2019 आहे, असे ते म्हणाले.
श्री. नितनवरे म्हणाले की, अंतिम मुदतीआधी विमा सादर करण्यासाठी नजीकची आपली बँक शाखा, सहकारी सोसायटी किंवा जनसुविधा (सीएससी) केंद्राशी संपर्क साधावा, जनसुविधा केंद्रामार्फत पीकविमा भरताना विमा हप्त्याशिवाय कोणतीही आगाऊ रक्कम भरण्याची गरज नाही.
COMMENTS