वेब टीम : अहमदनगर कापूरवाडी गावालगत मोठ्या प्रमाणात खडीक्रेशरची संख्या वाढल्याने या भागातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल...
वेब टीम : अहमदनगर
कापूरवाडी गावालगत मोठ्या प्रमाणात खडीक्रेशरची संख्या वाढल्याने या भागातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने सदर सर्व खडीक्रेशरची तातडीने चौकशी करुन प्रमाणापेक्षा अधिक वाढलेल्या अनाधिकृत खडीक्रेशरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनतंत्र फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय म्हस्के यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना दिले.
कापूरवाडी गावात (ता. नगर) गेल्या 30 ते 35 वर्षापासून सर्व खडीक्रेशर नियमाने चालले असल्याचे दाखवून अनेक अनाधिकृत खडीक्रेशर देखील चालू आहे. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वायु, ध्वनी प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कापूरवाडी गावात डोंगराच्या पोटाला 36 पेक्षा जास्त खडी क्रेशर अंदाजे 1985 ते 1990 पासून चालू आहे. हळूहळू यांच्या संख्येत वाढ होत गेली आहे. खडीक्रेशर चालू करण्यासाठी प्रशासन विभाग व प्रदूषण नियंत्रण बोर्डाची मंजुरी घ्याव्या लागतात.
परंतु या खडीक्रेशर मालकांचा जवळजवळ कोणतेही विभागाचे मंजुरी पत्र नसून ते अनाधिकृतपणे चालू आहे. एका खडीक्रेशरच्या नावाखाली चार ते पाच खडीक्रेशर चालवले जात असल्याचा आरोप जनतंत्र फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.
गर्दीच्या ठिकाणी अथवा गावाच्या जवळ खडीक्रेशर चालवण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र खडीक्रेशरच्या शेजारी लोकांचे घरे तथा शेती आहे. या खडीक्रेशरमुळे या भागात ध्वनी व वायू प्रदुषण पसरले असून, हवेबरोबर दगडाचे बारीक बारीक कण उडून लोकांच्या डोळ्यात व पोटात जात आहे.
तोंडाला व नाकाला रुमाल अथवा कपडा लावून नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. सन 2016 मध्ये प्रशासनाच्या सहकार्याने गावकर्यांनी चार ते पाच महिने अनेक खडीक्रेशर बंद केले होते. मात्र या खडीक्रेशर मालकांची व संबंधीत सरकारी विभागातील अधिकार्यांचे हितसंबंध असल्याने हे खडीक्रेशर पुन्हा चालू करण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
येत्या 15 दिवसात या खडीक्रेशरची चौकशी होऊन अनाधिकृत खडीक्रेशर बंद न झाल्यास ग्रामस्थांसह जनआंदोलन उभारण्याचा इशारा जनतंत्र फाउंडेशनचे अध्यक्ष म्हस्के यांनी दिला आहे.
COMMENTS