वेब टीम : कोलकाता भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौर्यावर आहे. टी-20 मालिकेत विडिंजला व्हाईटवॉश दिल्यानंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याचे लक...
वेब टीम : कोलकाता
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौर्यावर आहे. टी-20 मालिकेत विडिंजला व्हाईटवॉश दिल्यानंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारताने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ या मालिकेत दमदार आहे. पण, त्यांचे कसोटी क्रमवारीतले अव्वल स्थान धोक्यात आले आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात बुधवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी न्यूझीलंडला आहे. त्यांच्या खात्यात सध्या 111 गुण आहेत, तर अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या खात्यात 113 गुण आहेत.
न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने श्रीलंकेला नमवल्यास ते अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकतात. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटमधील प्रत्येक सामना चुरशीचा होणार आहे. 2 वर्ष चालणार्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे.
1 ऑगस्ट 2019 पासून या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेनुसार अव्वल 9 संघ पुढील दोन वर्षांत होम-अवे अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत.
COMMENTS