वेब टीम : बेंगळुरू देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. तेव्हापासून देश भारतीय राज्यघटनेवर चालत आहे. या राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाल...
वेब टीम : बेंगळुरू
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. तेव्हापासून देश भारतीय राज्यघटनेवर चालत आहे. या राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे.
अजूनही देशात जातीपातीच्या भिंती मजबूत आहेत. अनेक ठिकाणी जातिभेदाच्या घटना घडतात; परंतु एखाद्या खासदारालाच जातिभेदाची शिकार व्हायला लागणे, ही देशातील अत्यंत लाजीरवाणी घटना घडली आहे.
कर्नाटकातील गोलरहट्टी गावातील प्रकार
कर्नाटकातील चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार ए. नारायणस्वामी यांना त्यांच्याच मतदारसंघातील एका गावात दलित असल्याच्या कारणावरून प्रवेश रोखल्याची घटना घडली आहे.
ही घटना जेव्हा घडली तेव्हा ते काही डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसमवेत मतदारसंघाचा दौरा करत होते. तुमाकुरू जिल्ह्यातील पावागडा तालुक्यातील एका गावात सोमवारी हा प्रकार घडला आहे. गोलरहट्टी येथे केवळ गोल्ला समाजाचे लोक राहतात. या लोकांनी दलित असल्याचे कारण पुढे करून गावात येत असलेल्या खासदारांना गावाबाहेरच रोखले.
स्थानिकांच्या मते कोणत्याही दलित लोकांना गोलरहट्टी गावात येण्याची परवानगी नाही. ए. नारायणस्वामी हे दलित समाजाचे आहेत, तर या गावात राहत असलेले लोक गोल्ला समाजाचे आहेत. त्यांचा हा समाज इतर मागासवर्गीय (ओबीसी)मध्ये मोडतो.
स्थानिक लोकांच्या मते, अनुसूचित जातीच्या लोकांना गावात येण्याची किंवा काही करण्याची परवानगी नाही. सोबत आलेल्या लोकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ते तयार झाले नाहीत. यानंतर काही वेळाने यापैकी काही ग्रामस्थांच्या दुसऱ्या गटाने खासदारांना गावात बोलावले.
मात्र माझ्यामुळे तुमच्या गावात तंटा नको, असे म्हणत ए. नारायणस्वामी आपल्या कारमध्ये बसून निघून गेेले. या घटनेनंतर पोलिसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. खासदारांना गावात येण्यापासून कुणी रोखले, हे अजूृन स्पष्ट झालेले नाही. आम्ही आरोपींचा शोध घेत असून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
विशेष माहीतीनुसार,चित्रदुर्ग हा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. आपण दलित असल्याने आपल्या गावात प्रवेश नाकारला हे बघून आपल्याला खूप वाईट वाटले.
आपण लोकांच्या समस्या जाणून त्यांना आवास आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी गेलो होतो. मला कुणाविरूध्द तक्रार करायची नाही. त्याचे मन बदलवणे महत्वाचे आहे असे ए.नारायणस्वामी यांनी म्हटलेले आहे.
COMMENTS