वेब टीम : मुंबई सावरकरांनी कोणताही हिंसाचार केला नाही. कोणीही सावरकर यांच्या सन्मानाबाबत आणि सच्चेपणाबाबत प्रश्न उपस्थित करु शकत नाही अ...
वेब टीम : मुंबई
सावरकरांनी कोणताही हिंसाचार केला नाही. कोणीही सावरकर यांच्या सन्मानाबाबत आणि सच्चेपणाबाबत प्रश्न उपस्थित करु शकत नाही असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. राजकीय मतभेद असू शकतात. मात्र एखाद्या व्यक्तीच्या कार्याबद्दल संशय घेणे चुकीचे असल्याचे राम नाईक यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा डीएनए हा सावरकर द्वेषाचा असून त्यांच्यात तो काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून आला असल्याचे राम नाईक म्हणाले.
राहुल गांधी यांचे आडनाव गांधी आहे मात्र महात्मा गांधी आणि त्यांचा काहीही संबंध नाही. महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांनी एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये १९२० मध्ये यंग इंडिया या साप्ताहिकात महात्मा गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढल्याचे नाईक म्हणाले.
देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनीही एक पत्र लिहून सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव केला होता, असेही नाईक म्हणाले. २००३ मध्ये मी पेट्रोलियम मंत्री होतो. त्यावेळी वीर सावरकर यांचं तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात यावे असा प्रस्ताव मी सगळ्यांसमोर मांडला होता.
माझ्या प्रस्तावाला त्यावेळी सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. मात्र सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू असा व्हीप काढला होता, याची आठवणही राम नाईक यांनी करून दिली.
COMMENTS