file photo वेब टीम : पुणे नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या करणावरून अटक केलेल्या कार्यकर्त्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक...
file photo |
वेब टीम : पुणे
नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या करणावरून अटक केलेल्या कार्यकर्त्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे पोलिसांचे खच्चीकरण करणारे आणि जातीयवादी आहे, अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार असतानाच अर्बन नक्षल, अर्बन नक्षल फ्रंट हा शब्द उदयाला आला; त्यावेळी ज्यांनी आराडाओरडा केला तेच आज पवारांची दिशाभूल करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सोमवारी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणी कबिर कला मंचचे सुरेंद्र गडिंग्लज, सुधीर ढवळे, इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयरच्या अध्यक्षा सुधा भारद्वाज, रिव्होलश्नरी रॉयटर्स असोसिएशनचे वरवरा राव, रोना विल्सन अरण परेरा यांना केवळ प्रक्षोभक भाषणे, कविता, साहित्य, नक्षलवादी विचार आणि एल्गार परिषदेप्रकरणी अटक केलेली नाही.
त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पोलिसांना पुरावे सापडलेले आहेत. विशेष म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १८ फेब्रुवारी २०१४ रोजी नक्षलवादी चळवळीसंबंधी कार्यरत असणार्यांची यादी लोकसभेत जाहीर केली होती. या यादीत या सर्वांची नावे अग्रस्थानी असून पवार यांच्या मंत्रीमंडळापैकी राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी २००७,२०११ मध्ये यांना अटक केलेली आहे.
त्यामुळे या कार्यकर्त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात अटक होते ती योग्य आणि भाजपच्या कार्यकाळात अटक केली तर ते जातीवादी कसे? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून पोलिसांची चौकशी करून पोलिसांवरच खटले दाखल करावे, असेही पवार यांनी सांगितले आहे. परंतु, यातून पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे.
सुधा भारद्वाज यांच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तर स्पष्ट निर्णय दिल्यानंतरच त्यांना अटक केली आहे. उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयानेही पुरावे पाहूनच त्यांना जामीन नाकारला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अल्पमतातील निर्णय सांगून पवार सोयीची भूमिका घेत असल्याचा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.
COMMENTS