वेब टीम : अहमदनगर गेल्या ४५-५० दिवसांपासून सर्वसामान्य गोरगरीब जनता लॉकडाऊनमुळे घरात बसून काटेकोरपणे सर्व नियामंचे पालन करत आहे. अशा पर...
वेब टीम : अहमदनगर
गेल्या ४५-५० दिवसांपासून सर्वसामान्य गोरगरीब जनता लॉकडाऊनमुळे घरात बसून काटेकोरपणे सर्व नियामंचे पालन करत आहे. अशा परिस्थितीत केवळ ‘महसूल’चे कारण देत सरकारने सर्व दारूचे दुकाने चालू करण्याचा जो ‘बेशुद्ध’ निर्णय घेतला आहे. त्याचा जाहीर निषेध जागरूक नागरिक मंच करत आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्या पासून गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी हजारो नागरिक मदत करत असताना दारू सुद्धा जीवनावश्यक वस्तू आहे हे या सरकारच्या निर्णयाने दाखऊन दिले आहे. दारू जर जीवनावश्यक वस्तू आहे तर दारू घेणाऱ्यांसाठी चखनाही महत्वाचा आहे. म्हणून जागरूक नागरिक मंचच्यावतीने राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासठी पोषक आहार म्हणून ‘कोरोना’ स्पेशल चखण्याचे पाकिटे दारू घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांना देऊन आंदोलन केले आहे.
जो पर्यंत राज्य सरकार हा ‘बेशुद्ध’ निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू असणार आहे. या सरकारने प्रेरणा देणारे मंदिरांची दारे बंद करून ‘मदिरा’च्या दालनांचे दारे उघडली आहेत. दारूच्या दुकानांपुढे झालेली गर्दी सरकारला चालते मात्र एखाद्याच्या अंत्यविधीसाठी आलेले नातेवाईक चालत नाहीत.
दारूच्या नशेत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. खून, आत्महत्या झाल्या आहेत. मात्र सरकारला या घटनांचे काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त ‘महसुल’चे पडले आहे. देशातले लोक शुध्दीत असतानाही शहाण्यासारखे वागत नाहीतर दारू पिऊन बेशुध्द झाल्यावर कसे वागतील? याचा तरी विचार सरकारने करायला हवा होता. पण दुर्दैवाने कदाचित सरकार मधेच काही ‘तंबाखू’ छाप व काही ‘मोसंबी’ छाप बसलेले असल्यामुळे त्यांनी या समदु:खी मंडळीचे दु:ख, दारू खुली करून हलकं केल असावं, अशा तीव्र शब्दात सरकारचा निषेध मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी केला आहे.
सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारच्या दारू विक्री करण्याच्या निर्णयाचा निषेध करत वाडीयापर्क जवळील दुकानात दारू घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासठी पोषक आहार म्हणून ‘कोरोना’ स्पेशल चखण्याचे पाकिटे देऊन अभिनव आंदोलन केले. चखण्याच्या पाकिटावर ‘जीवनावश्यक दारूसाठी पोषक आहार’ असा उपहासात्मक उल्लेख केला होता.
जागरूकच्या या अभिनव आंदोलनास आ. संग्राम जगताप यांनी भेट देऊन पाठींबा दिला. ते म्हणाले, जागरूक नागरिक मंच कायमच चांगले काम करून नागरिकांच्या प्रश्नांना हात घालत आहेत. आता हे चखना आंदोलन करून चांगलीच जनजागृती केली आहे. त्यांना कायम माझा पाठींबा राहील.
यावेळी मंचचे कैलास दळवी, पै. भैरवनाथ खंडागळे, योगेश गणगले, हरिभाऊ डोळसे, सुनील कुलकर्णी, राजू पडोळे, बी.यु कुलकर्णी, अमेय मुळे आदि सहभगी झाले होते.
COMMENTS