वेब टीम : मुंबई कोरोना विषाणूमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ सुरू केले ...
वेब टीम : मुंबई
कोरोना विषाणूमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ सुरू केले आहे.
या ऑपरेशनतंर्गत भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये पोहोचली आहे.
मालदीवची राजधानी मालेमध्ये ही युद्धनौका दाखल झाली आहे.
आयएनएस जलाश्व बरोबर आयएनएस मगर ही युद्धनौका सुद्धा या मिशनमध्ये असणार आहे.
पहिल्या टप्प्याच्या ऑपरेशनमध्ये मालदीवमधून १ हजार भारतीयांना परत आणणार आहे.
मालदीवमधून भारतात येताना नागरिकांना COVID-१९ संबंधित सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल.
मायदेशी परतणाऱ्या भारतीयांना प्रवासा दरम्यान बेसिक आणि वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.
‘COVID-१९ शी संबंधित आव्हानांमुळे नागरिकांना कठोर नियमांचे पालन करावे लागेल’ असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
मालदीवहून निघाल्यानंतर या युद्धनौका केरळ कोचीमध्ये येतील.
सर्व प्रवाशांना तिथेच उतरवण्यात येईल. त्यानंतर संबंधित राज्यांकडे सुपूर्द केले जाईल.
ऑपरेशन समुद्र सेतू परराष्ट्र, संरक्षण, गृह, आरोग्य आणि अन्य मंत्रालयांशी समन्वय राखून सुरु असल्याचे नौदलाने सांगितले.
भारताने आयएनएस शार्दुल ही युद्धनौका संयुक्त अरब अमिरातीला पाठवली.
याशिवाय १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणणार आहे.
COMMENTS