वेब टीम : दिल्ली भारत आणि चीन यांच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे सुमारे 20 जवान हुतात्मा झाले ...
वेब टीम : दिल्ली
भारत आणि चीन यांच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे सुमारे 20 जवान हुतात्मा झाले आहेत. चीनच्याही ४३ सैनिकांना भारतीय सैनिकांनी यमसदनी धाडून जोरदार प्रत्त्युत्तर दिले.
गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात असून, ते वारंवार आमनेसामने येऊन याआधीही संघर्ष झाला आहे. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले आहेत मात्र, अद्याप गोळीबार झालेला नाही.
भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे काल रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले.
भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना घडली आहे. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले आहेत.
या आधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. भारतीय लष्कराने चीनच्या बाजूचे सैनिकही मारले गेल्याचा दावा केला असून, त्यांची संख्या आताच सांगणे शक्य होणार नाही, असे म्हटले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने सर्व सैन्यदल प्रमुखांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
COMMENTS