वेब टीम : मुंबई राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्वच धार्मिक स्थळे कुलूपबंद करण्यात आली. जवळपास सात महिन्यांपासून देवळातील देव बंधिस्त...
वेब टीम : मुंबई
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्वच धार्मिक स्थळे कुलूपबंद करण्यात आली.
जवळपास सात महिन्यांपासून देवळातील देव बंधिस्त असून, राज्य सरकारने तात्काळ मंदिरे उघडी करावी, अशी मागणी सर्वच स्तरावरून केली जात आहे.
आज भाजपकडून राज्यभरात मंदिरे उघडी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे.
त्यातच आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र पाठवून राज्यातील देवालये बंद का? असा प्रश्न विचारला आहे.
आज राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, जून महिन्यापासून देशातील मंदिरे उघडी झाली आहेत.
मात्र आपल्या राज्यात अद्यापही याबाबत निर्णय झाला नाही.
मिशन बिगेन अंतर्गत आपण लोकडाउन कचऱ्याच्या डब्ब्यात टाकणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र आता आपल्याला हिंदुत्वाचा विसर पडला का? धर्मनिरपेक्ष धोरण स्वीकारले का?
मंदिरे उघडी न करण्यासाठी दैवी संकेत मिळाले का? असा प्रश्न कोश्यारी यांनी उपस्थित केला आहे.
आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाऊन आलात.
आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन विठ्ठलाला अभिषेक करून आलात.
मात्र सामान्य भक्त अद्यापही मंदिरात बंद असलेल्या देवाला भेटण्यासाठी आतुर आहेत.
त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की, आपण तात्काळ मंदिरे उघडी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी राज्यपालांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
COMMENTS